हुताम्यांचे गोडवे गाणा-या लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांचे पंचायत समिती परीसरातील हुतात्मा स्मारकाकडे दुर्लक्ष

60

मूल (प्रतिनिधी) राष्ट्रीय सण आणि जयंती व स्मरणदिनाच्या कार्यक्रमा मधून हुतात्म्यांचे गोडवे गाणा-या स्थानिक लोकप्रतिनिधीना ऐरव्ही हुतात्म्यांचे स्मरण होत नसल्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यांत आलेले पंचायत समिती परिसरातील स्मारक वर्षानुवर्षे दुर्लक्षीत पडले आहे.

1962 मध्यें निर्माण झालेल्या मूल येथील पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वारा लगत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ 1973 मध्यें स्मारक निर्माण करण्यात आले आहे. ज्यावेळेस सदर स्मारकाची निर्मिती झाली त्यावेळेस सावली तालुका मूल तालुक्याशी संलग्न होता शिवाय पंचायत समितीही एकच होती. त्यामूळे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभावर सावली येथील 18 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांपैकी बापुजी व्यंकया येलचलवार, बापु सिताराम संतोषवार, डोनु पोशट्टी रामगुंडेवार, बाबुराव विट्ठलराव राईंचवार आणि जागोबा राजन्ना संगीडवार या पाच आणि राजोली येथील गोपाळा नागो तरारे व मूल येथील केशव पंचम जांभुळकर हया सात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा नाम्मोलेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या नांवानिशी उभारण्यांत आलेला हा स्मृती स्तंभ योगायोगाने पुर्वीच्या जुन्या आणि आताच्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारा लगत दर्शनी भागात आहे. त्यामूळे पंचायत समिती मध्यें ये-जा करणा-या सर्वच क्षेत्रातील नागरीकाचे या स्मृती स्तंभाकडे लक्ष गेल्याविना राहत नाही, असे असतांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या स्मरणार्थ निर्माण करण्यांत आलेले सदर स्मारक कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत राहावे. ही शोकांतीका आहे. ज्या पंचायत समिती परिसरात सदर स्मारक उभे आहे त्या पंचायत समिती मध्यें आजवर शेकडो लोकप्रतिनिधी आले आणि गेले, अनेक नेत्यांसह जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आदी वरिष्ठ अधिका-यांनीही भेटी दिल्या, नव्हे तर पंचायत राज समितीच्या सदस्यांनीही भेटी दिल्या, परंतू आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांचे या स्मारकाकडे लक्ष जावू नये, या विषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. वास्तविक ज्या परिसरात सदर स्मारक उभे आहे त्या परिसराची निगा आणि देखरेख करणा-या पंचायत समिती प्रशासनाने तरी किमान या स्मारकाची देखभाल व दुरूस्ती करणे, वर्षातुन किमान एकदा तरी स्मारकाची रंगरंगोटी करण्याची जबाबदारी स्विकारायला पाहिजे, परंतू त्याही पंचायत समिती प्रशासनाने या स्मारकाच्या सौदर्यीकरणाकडे पाठ फिरवावी, हे न उलगडणारे कोडे आहे. राष्ट्रीय सणांचे दिवशी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे गोडवे गाणा-या, हुतात्म्यांच्या नांवाने मत मागणा-या नेत्यांनी तरी किमान आपल्या परिसरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सदर स्मारकांच्या सौदर्यीकरणाची जबाबदारी स्विकारावी, तुर्त एवढीच अपेक्षा आहे.
पंचायत समिती समोरील प्रवेशव्दाराचे सुशोभीकरण आणि परीसराचा विकास करताना दुरावस्थेत सापडलेल्या हुतात्मा स्मारकाचे सौंदर्यीकरण येत्या सहा महीण्यात करणार असल्याची ग्वाही मार्च २०२१ मध्ये तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी मयुर कळसे आणि जि.प.बांधकाम उपविभाग मूलचे अभियंता गोंगले यांनी दिली होती. आज तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी कळसे बदलुन इतरञ गेले परंतु बांधकाम उपविभागाचे अभियंता गोंगले आजही मूल येथे सेवारत आहेत. सहा महीण्यात सौंदर्यीकरण करू. अशी ग्वाही देवुन आज दोन वर्षे पुर्ण झाली. परंतु अभियंता गोंगले यांचे सहा महीणे अजुनही पुर्ण झालेले नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here