आर.ओ.केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना आरोग्याची चिंता, अव्वाचा सव्वा विज बिल आल्याने आर.ओ.केंद्र बंद

59

मूल : शुध्द व थंड पिण्याचे पाणी पुरवठा करणारे आर. ओ. केंद्र सात दिवसांपासून बंद असल्याने ग्राम पंचायतीच्या नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामूळे जनतेला आरोग्याची भिती वाटत असल्याने बंद असलेले आर.ओ.केंद्र सुरू करावे. अशी मागणी चिरोलीवासीयांनी केली आहे.

आरोग्याच्या दृष्टीने जनतेला अत्यल्प दरात शुध्द व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तालुक्यातील चिरोली येथे राईट वाॅटर सोल्युशन इंडीया प्रा.लि. ने जलशुध्दीकरण केंद्र (आर.ओ.) सुरू केले. 2 रूपयात 20 लिटर पाणी जनतेला पुरवठा करणारे आर.ओ.केंद्र सुरू केल्याने चिरोलीवासीय सार्वजनिक नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यापेक्षा आर.ओ.केंद्राद्वारे उपलब्ध होणारा पाणी पिण्यासाठी मोठया प्रमाणांत वापरत होते. जनतेला आर.ओ.केंद्रामधून शुध्द आणि थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होवू लागल्याने आरोग्याच्या चिंतेपासून चिरोलीवासीय बिनधास्त होते. दरम्यान मागील सात दिवसांपासून येथील आर.ओ.केंद्र बंद असल्याने चिरोलीवासीय शुध्द आणि थंड पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने त्यांना आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. पिण्याच्या पाण्यामूळे आरोग्य बिघडू नये म्हणून आर.ओ.केंद्र तातडीने सुरू करावे. म्हणून ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेवून ग्राम पंचायतीनेही आर.ओ.केंद्राचे संचलन करणा-या राईट वाॅटर सोल्युशन इंडिया कंपनी व्यवस्थापनाला आर.ओ.केंद्र सुरू करण्याची विनंती केली. परंतू आजपर्यंत आर.ओ.केंद्र सुरू झालेले नाही. बंद असलेल्या आरोग्य केंद्राचे संचलन करणा-या कंपनीच्या अंकुश मालवीय यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दर दोन महिण्याला येणारे 300 ते 400 रूपयाचे विज बील यावेळेस तब्बल 26 हजार रूपये आले. बिलाच्या रक्कमेत मोठया प्रमाणांत तफावत असल्याने याबाबत विज वितरण कंपनी आणि ग्राम पंचायतीला कळवुन विज बिलात सुधारणा करून देण्याची विनंती केली. परंतू अजून पर्यंत विज वितरण कंपनीने विज बिलात सुधारणा करून दिलेली नाही. उलट एकुण बिलाच्या रक्कमेमधून किमान अर्धी रक्कम भरावी. असा आग्रह धरला आहे. आर.ओ.केंद्रामधून पाणी पुरवठा करण्यापोटी मिळणा-या रक्कमेपेक्षा विज बिलाची रक्कम तिप्पटीची आहे. त्यामूळे विज बिला बाबत तडजोड होईपर्यंत आर.ओ.केंद्र सुरू करता येणार नाही. असे मालवीय यांनी सांगीतले. त्यामूळे चिरोलीवासीयांची शुध्द आणि थंड पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अडचणीची होत असून ग्रामस्थांची अडचण सोडविण्यास ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा वर्तविल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here