चितेगांव, मरेगांव येथील रेती घाटाविरूध्द ग्राम पंचायतीचा एल्गार

111

मूल : तालुक्यातील चितेगांव व मरेगांव येथील बेकायदेशीर रेती घाट तातडीने बंद करावे अशी मागणी श्रमिक एल्गारने आज तहसिलदार मूल यांचेकडे केली आहे. श्रमिक एल्गारचे विजय सिध्दावार यांचे नेतृत्वात चितेगांवच्या सरपंचा कोमल रंदये मरेगांवच्या सरपंचा लक्ष्मी लाडवे, ग्रा.प.सदस्य हरीदास गोहणे, संजय मेश्राम यांचेसह गावकरी उपस्थित होते.
ग्राम पंचायत चितेगांव व मरेगांव यांना मागील अनेक वर्षापासून, शासनाने रेती लिलावातून शासनाला प्राप्त महसूलातून सामित्व निधी दिलेला नाही. ही थकबाकी देण्यात यावी अशी ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी यापूर्वीच मागणी केली होती, मात्र या मागणीची दखल न घेताच, कंत्राटदाराने चितेगाव येथील रेती घाटातून रेतीचा उपसा सुरू केलेला आहे, ही बाब चितेगाव येथील ग्रामपंचायतीवर अन्याय करणारी असल्यांचे निवेदनातून म्हटले आहे.
शासनाचे नियमाप्रमाणे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे नदीपात्रात यांत्रिकी साधनाने रेतीचा उपसा करता येत नाही. मात्र चितेगांव येथील रेतीघाटात कंत्राटदारांनी नदीच्या पात्रात पोकलेन, जेसीबी सारखे यांत्रिक साधन वापरून रेतीचा उपसा करीत असल्यांचे निवेदनातून लक्ष वेधले आहे. रेती घाट लिलाव केल्यानंतर, रेती घाट कंत्राटदारास ताबा देण्याची शासनाने विहित पद्धती निश्चित केलेली आहे. मात्र या पद्धतीने रेती घाटाचा ताबा देण्यापूर्वीच मोजणी न करता, सीमांकन न करताच रेती घाटातून रेतीचा उपसा सुरू केलेला असल्यांचा आरोपही केला आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष रेतीचा उपसा केला जात आहे, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा अजूनही लावण्यात आलेले नाही. चितेगाव येथील रेती कंत्राटदार हे यांत्रिक साधनांचा वापर करून रेती उपसा करत असल्याने, गावातील कोणत्याही मजुरांना रेती उपसातून रोजगार मिळत नाही. यामुळे गावकर्यात असंतोष निर्माण झाला असून, येथील रेती घाट तातडीने बंद करण्याची कार्यवाही न केल्यास चितेगाव येथील गावकरी व श्रमिक एल्गारचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here