तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या आशिषचा वाघाने घेतला बळी

28

मूल – वनपरिक्षेञ मूल अंतर्गत तालुक्यातील पडझरी-रत्नापुर जंगलातील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये आज सकाळी ६-३० वाजताचे सुमारास रत्नापूर येथील चार ते पाच जण तेंदूपान तोडण्यासाठी गेले होते. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष सुरेश सोनुले (३४) यांचेवर हल्ला करून जागीच ठार केले. वाघाने हल्ला करून ठार केल्याने रत्नापूर- पडझरी परिक्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील जंगल व्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात मजुर काम नसल्याने पोटाची खडगी भरण्यासाठी तेंदूपान तोडणीला जातात. परीसरातील रत्नापुर पडझरी परीसरातील काही मंडळी पहाटे गांवालगतच्या जंगलात तेंदुपाने तोडणीला गेले होते. नेहमी प्रमाणे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पान तोडणी करत असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने आशिष सोनुले याचेवर हल्ला करून काही दुर अंतरावर ओढत नेले. जवळपास असलेल्या सोबतच्या मंडळीना वाघाने आशिषवर हल्ला केल्याचे लक्षात येताच आरडाओरड केल्याने वाघ जंगलात पळुन गेला.
चालू वर्षातील वाघाने ठार केल्याची मुल तालुक्यातील पहिली घटना आहे. मागील वर्षी तालुक्यात वाघाने ठार केल्याच्या एकुण १७ घटना घडल्या. आज घडलेल्या घटनेची माहीती होताच ग्रामस्थांनी वन विभागा विरूध्द रोष व्यक्त करत काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी उचलुन धरली आहे. वाघाच्या हल्यात आज मृत्यु पावलेल्या आशिष सुरेश सोनुले यांचे पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
सदर घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक पाकेवार, वनरक्षक एस.जी. पाकडे , वनरक्षक ज्योती दवरेवार यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाचे शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तेव्हा क्षेत्र सहायक पाकेवार यांनी मृतकाच्या पत्नीला २५ हजार रूपयाची मदत देण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here