मूल : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे भात पिकाचे काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला पूर्वसूचना द्याव्यात असे आवाहन तालुका कृषि अधिकारी प्रशांत कासराळे यांनी केले आहे.
सध्या तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, शेतकऱ्यांची नुकसान झालेली दिसत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत विमा संरक्षीत क्षेत्र नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत भात पिकाच्या काढणीनंतर शेतात कापणी करून पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या भात पिकाचे काढणीनंतर २ आठवडयांच्या आत (१४ दिवस) अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून योजनेच्या निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
काढणी पश्चात नुकसान या जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबतची सूचना ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड या पीक विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक वर माहिती द्यावी. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी कार्यालय व ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा इत्यादीद्वारे नुकसानीबाबतची पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भात पिकाचे काढणीनंतर नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला पूर्वसूचना द्याव्यात असे आवाहन तालुका कृषि अधिकारी प्रशांत कासराळे यांनी केले आहे.