रानडुकरांमुळे धानाच्या पीकांची नासधूस
शेतकरी त्रस्त,बंदोबस्त करण्याची मागणी
शेतकरी आर्थिक संकटात,नुकसान भरपाई मिळावी
मूल :- रानडुकरांमुळे धानाच्या पीकांची मोठया प्रमाणात नासधूस होत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहे.शेतक-यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करावा तथा रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. अवकाळी आणि किडीच्या रोगातून सावरलेल्या शेतक-यांपुढे रानडुकराचे मोठे संकट डोळयांपुढे उभे ठाकले आहे.हाती आलेले धानाचे पीक मोठया प्रमाणात रानडुकर नाशधुश करीत आहे. रानडुकरांचा कळपच्या कळप शेतात घुसून पीकांचा फडसा पाडत आहे.रानडुकरांच्या संदर्भात काहीच करू शकत नसल्याने धान उत्पादक शेतकरी हताश झाला आहे.हाती आलेले पीक मोडकळीस पाहून शेतकरी मेटाकुटीला जात आहे. त्याची वर्षभराची मेहनत वाया जात असल्याने त्याच्या पुढे मोठे सकंट या निमित्ताने निर्माण झाले आहे.यावर्षी ब-या पैकी उत्पन्न मिळण्याची आशा शेतक-यांना होती.परंतु बरेचशे पीक रानडुकर नाशधुश करीत असल्याने उत्पन्नात फरक पडण्याची भिती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
मूल सावली भागात धानाचे मोठया प्रमाणात पीक घेतले जाते. वनव्याप्त परिसर असल्याने येथे रानडुकरांचा मोठया प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे.दरवर्षी रानडुकरांमुळे धानाचे पीक उदध्वस्त होते. साधी मदतही वनविभागाकडून शेतक-यांना प्राप्त होत नाही.विविध संकटामुळे धान पीकांवर झालेला खर्चही शेतक-यांना निघत नाही.शेतकरी जगेल कसा ?असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झालेला आहे. शासन आणि वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा.अन्यथा शेतक-यांना रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची परवानगी दयावी.अशी मागणी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदिप कारमवार यांनी केली आहे.
रानडुकरांमुळे धानपीकाचे मोठे नुकसान झाले.याची वनविभागाकडे तक्रार करण्यात आली.वनविभागाने पंचनामा केला.परंतु अद्यापही साधी दमडीही शेतक-यांना मिळाली नाही.दोन वर्षांपासून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे.शासन आणि वनविभागाच्या दिरंगाई मुळे धान उत्पादक शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडत आहे.
श्री.संदिप कारमवार,धान उत्पादक शेतकरी,आकापूर.
![](https://multoday.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221026_104626-300x169.jpg)
![पिकाची झालेली नासाडी](https://multoday.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221026_101810-300x169.jpg)